वडगाव मावळ:
मार्च १८८२या दिवशी जर्मन फिजिशियन व मायक्रोबायोलॉजिस्ट रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या बॅक्टेरियाचा शोध लावला व क्षयरोगाचे कारण मायको बॅक्टेरियम ट्युबरक्यूलाय हा बॅक्टेरिया असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे क्षयरोगाच्या निदानामध्ये आणि उपचारांमध्ये मोठी मदत मिळाली. या ऐतिहासिक घटनेचे प्रतीक म्हणून 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो.
या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून या जीवघेण्या आजाराबाबत जनजागृती केली जाते. मावळ तालुक्यात वर्ष 2022 मध्ये एकूण 756 रुग्णांची नोंद झालेली असून त्यापैकी 607 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच वर्ष 2023 मध्ये 547 नवीन क्षयरुग्णांची नोंद झालेली आहे. वडगाव मावळ तालुक्यात क्षयरोगाच्या तपासणीसाठी 11 सूक्ष्मदर्शक केंद्र कार्यान्वित असून 1 TruNaat मशीन  उपलब्ध आहेत.
24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी  डॉ. शॅरन सोनवणे  यांनी पुढील प्रमाणे कार्यक्रमांचे  वडगाव मावळ तालुक्यात आयोजन केलेले आहे.
अ) सर्व आरोग्य संस्थांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करून संशयित क्षयरुग्णांची  तपासणी करून घेणे.
ब) सर्व आरोग्य संस्थांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी रॅली काढणे, कॉर्नर मिटिंग घेऊन माहिती देणे.
क) क्षयरुग्णांच्या सहवासातील व्यक्तींची तपासणी करून घेणे व त्यांना क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार देणे.
ख) बॅनर, पोस्टर व माहितीपत्रकांद्वारे आठवडे बाजार व गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करणे.
ड) सोशल मीडियावर क्षयरोग प्रश्नमंजुषा घेऊन सहभागी व्यक्तींना प्रशस्तीपत्र देणे.
य) निक्षय मित्र योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांना निक्षय मित्र बनविणे.
क्षयरोगाची लक्षणे :- दोन किंवा दोन आठवडयापेक्षा जास्त दिवस असलेला बेडका युक्त खोकला, बारीक परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, वजन कमी होणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, रात्री घाम येणे, बेडक्यातून रक्त पडणे, मानेवर गाठी येणे इ. वरील लक्षणाखेरीज शरीरातील ज्या अवयवाचा क्षयरोग झाला असेल त्याप्रमाणे लक्षणे दिसुन येतात.
संशयीत क्षयरोग्याचे दोन थुंकी (बेडका) नमुने क्षयरोगाचे रोगनिदान करण्यासाठी मान्यता प्राप्त सुक्ष्मदर्शक केंद्रावर तपासणी केली जाते.
संशयीत क्षयरोग्याच्या एकही थुंकी नमुन्यात क्षयरोगाचे जंतु सुक्ष्मदर्शकाखाली दिसल्यास ती व्यक्ती फुप्फुसाचा थुंकी दुषीत क्षयरोगी असते. हा क्षयरोगाचा सर्वात जास्त संसर्गजन्य प्रकार आहे. ज्या संशयीत क्षयरोग्याच्या थुंकीत क्षयरोगाचे जंतु आढळून येत नाही व क्षकिरण (एक्स-रे) किंवा इतर चाचणी मध्ये क्षयरोगाचा दोष आढळला तर तो  थुंकी अदुषित फुफुसाच्या क्षयरोगी असतो. तसेच फुप्फुसाव्यतीरिक्त क्षयरोगाचे निदान व औषधोपचाराबाबत निदान व सल्ला तज्ञ वैदयकीय अधिकारी करतात.
अति जोखमीच्या व्यक्ती :-  थुंकी दुषीत क्षयरोग्याच्या संपर्कातील व्यक्ती, HIV बाधीत व्यक्ती, मधूमेह असलेला रुग्ण, उच्च रक्तदाब असलेला रुग्ण, प्रतिकारशक्ती कमी झालेली व्यक्ती, फुप्फुसाचे जुनाट आजार असलेली व्यक्ती (उदा. सिलीकोसीस, दमा इ.) वृध्द व्यक्ती, कुपोषीत व्यक्ती, मुत्रपिंडाचे रोग असलेली व्यक्ती तसेच steroid घेणारी व्यक्ती इ. यांना एक दिवसाचा जरी खोकला असला तरी त्यांची क्षयरोगाची तपासणी करून घ्यावी.
प्रतिबंध :-  क्षयरोग हो संसर्गजन्य आजार आहे क्षयरोगाचे जंतु मुख्यतः हवेतुन पसरतात फफुप्फुसाचा क्षयरोग झालेला रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा क्षयरोगाचे जंतू हवेमध्ये पसरतात. संपर्कात आलेली निरोगी व्यक्ती जेव्हा श्वास घेतो तेव्हा ते जंतु त्याच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी मनुष्याला क्षयजंतुचा संसर्ग होतो.
अशा सांसर्गीक व्यक्तीला क्षयरोग होण्याची आयुष्यभरातील शक्यता १० टक्के असते. क्षयरोगाच्या रुग्णाने सुरुवातीपासून खंड न पडता नियमित उपचार निश्चित मुदतीपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावा. क्षयरोगाच्या रुग्णाने खोकताना, शिंकताना तोंडापुढे रुमाल धरावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये,  थुंकी गोळा करण्यासाठी डब्याचा वापर करावा, डब्यावर झाकण ठेवावे व डब्यात गोळा झालेल्या  थुंकीची योग्य त-हेने विल्हेवाट लावणे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
क्षयरोग पूर्ण पणे बरा होवू शकतो मात्र त्यावरील उपचार निश्चित मुदतीपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण केला पाहिजे.
क्षयरुग्णांसाठी नवीन शासकीय योजना
अ) नवीन क्षयरुग्ण कळवा, 500 रुपये मिळवा – या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यक्तीने संशयित क्षयरुग्णास तपासणीसाठी संदर्भित केल्यास व सदर संशयितास क्षयरोगाचे निदान झाल्यास संदर्भित करणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात 500 रुपये जमा केले जातात.
ब) खाजगी डॉक्टरांसाठी  योजना- IMA अंतर्गत नोंदणीकृत डॉक्टरांनी क्षयरुग्णांचे निदान करून त्यांची क्षयरोग केंद्रात नोंदणी केल्यास 500 रुपये व उपचार पूर्ण केल्याची नोंद केल्यास पुनश्च 500 रुपये देण्यात येतात तसेच BAMS व BHMS डॉक्टरांनी संशयीत क्षयरुग्णास तपासणीसाठी संदर्भित केल्यास व संशयतास क्षयरोगाचे निदान झाल्यास सदर डॉक्टरांना 500 रुपये देण्यात येतात.
क) प्रत्येक क्षयरुग्णास उपचार पूर्ण होईपर्यंत प्रतिमहा 500 रुपये अनुदान पोषण आहाराकरिता देण्यात येते. क्षयरुग्ण खाजगी डॉक्टरांकडून जरी उपचार घेत असला तरी त्यास 500 रुपये अनुदान दरमहा दिले जाते तसेच शासकीय औषधे मोफत पुरवण्यात येतात.
निक्षय मित्र – संसर्गजन्य आजारामुळे होणा-या मृत्युमध्ये क्षयरोगाचा समावेश प्रमुख १० आजारांमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये व भारतामध्ये क्षयरोग आजाराचे व क्षयरोगामुळे होणा-या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार केला आहे. भारताने सन २०२५ पर्यंत क्षयरोगाचे दुरीकरण करण्याचे धोरण निश्चित केले आहे.
ज्या व्यक्तीचा आहार पोषक नाही अशा व्यक्तीमध्ये क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक असते.
तसेच ज्या व्यक्तींना क्षयरोग झाला आहे अशा व्यक्तींना उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळुनही उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसुन येतातच असे नाही. यामुळे क्षयरुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
या सर्व बाबींचा विचार करता केंद्र शासनाने प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान (PMTMBA) सुरु केला आहे. या मध्ये विविध देणगीदार (व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सहकार सेवा, विविध संस्था, निवडुन आलेले लोकप्रतिनिधी इ.) ज्यांना  निक्षय मित्र असे संबोधण्यात येते. त्यांच्या मार्फत क्षयरुग्णांना ६ महीने ते ३ वर्षासाठी कोरडा आहार पुरविण्यात येऊ शकतो.
जिल्हयातील ज्या क्षयरुग्णांनी आहारासाठी संमती दिली आहे त्यांना निक्षय मित्राच्या सहाय्याने पोषण आहार पुरवठा करायचा आहे.
संमती दिलेल्या क्षयरुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे.
तरी मा. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे आणि मा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शॅरन सोनवणे यांनी आवाहन केले आहे की वडगाव मावळ तालुक्यातील इच्छुक देणगीदारांनी प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियाना अंतर्गत निक्षय मित्र योजनेत सहभागी व्हावे व गरजू क्षयरुग्णांना पोषण आहार पूरवावा जेणेकरून जिल्ह्यातील क्षयरुग्ण लवकर बरे होतील व क्षयरोगाचा इतर लोकांना संसर्ग होण्याचा धोका कमी होईल.
खाजगी क्षेत्राकडून वैद्यकीय सेवा घेणाऱ्या क्षयरूग्णांची आरोग्य विभागास नोंदणी करणे अनिवार्य –
शासन अधिसूचना : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, अधिसूचना दिनांक १६ मार्च २०१८
नोंदणीचा उद्देश : प्रत्येक क्षयरूग्णांची नोंद होऊन त्याला उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित, उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना
• नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्था –
१) क्षयरोग निदान करणाऱ्या राज्यातील सर्व पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा, रेडिओलॉजी सुविधा
२) क्षयरूग्णांवर उपचार करणारे विविध पॅथींची सर्व रूग्णालये, डॉक्टर्स (सर्व बाह्य रूग्ण व अंतर रुग्ण सुविधा)
3) क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते
कायदेशीर तरतुदी : ज्या प्रयोगशाळा / डॉक्टर / रूग्णालये / औषध विक्रेते रुग्णांची नोंदणी करणार नाहीत, अशा संस्था / व्यक्ति क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येवून, भारतीय दंड विधान कलम २६९, २७० नुसार कारवाईसाठी पात्र आहेत. या कलमा अंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तिस किमान ६ महिने ते २ वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतुद आहे.
महाराष्ट्र राज्यातील क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व प्रयोगशाळा, क्षयरूग्णांवर उपचार करणारे विविध पॅथींची सर्व रुग्णालये / डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांना दि.१ जानेवरी २०२४  पासून आपल्याकडे निदान होणाऱ्या / उपचार घेणाऱ्या / औषधे घेणाऱ्या सर्व  रूग्णांची नोंदणी  जिल्हा  क्षयरोग कार्यालयास करण्यात यावी. क्षयरूग्ण नोंदणीसाठीच्या विहित नमुन्यातील माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्याकडे दरमहा पाठविण्यात यावी.

error: Content is protected !!