नामाचा नंदादीप
देवाची खरी भक्ती
अलौकिक, विस्मयकारक, विलक्षण अशा परमेश्वराची भक्ती करायची म्हणजे काय करायचे? त्याचे फक्त प्रेमाने स्मरण करायचे. प्रेमाने स्मरण करायचे म्हणजे काय? कृतज्ञतेने स्मरण करायचे. कृतज्ञतेने म्हणजे काय? अरे देवा तुझ्यामुळे मी आहे. हा श्वासोच्छ्वास तुझ्यामुळे आहे. तुझा मी अत्यंत ऋणी आहे. एवढे म्हटले तरी पुरे. हीच खरी देवाची भक्ती.
आपल्याला जेव्हा देवाचा विसर पडतो तेव्हा स्वस्वरूपाचा विसर पडतो. *देवाचा विसर म्हणजे स्वस्वरूपाचा विसर. देव म्हणजे आपले स्वरूप. सच्चिदानंद स्वरूप हे आपले स्वरूप आहे व यालाच ईश्वर असे म्हणतात.
ईश्वर: सर्वभूतानाम् हृदेशेर्जुन तिष्ठती
भ्रामयेन सर्व भुतानी यंत्रा रूढानी मायया
            हे भगवंताने आपल्याला सांगितलेले आहे. हा ईश्वराचा विसर पडतो तेव्हा निर्माण होतो तो अहंकार.* ईश्वर व अहंकार यांचा संबंध काय? हा ईश्वराचा विसर पडतो तेव्हा निर्माण होतो तो अहंकार. आज काय झालेले आहे? ईश्वराचा विसर पडलेला आहे हे ही लोकांना माहित नाही. *अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक सोडले तर बाकीच्या लोकांना ईश्वराचा विसर पडलेला आहे हे ही माहित नाही.
            ईश्वराचा विसर पडला म्हणजे काय झाले हे ठावूक नाही. या सगळया गोष्टींमुळे आपल्या जीवनांत दुःख भरलेले आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या जीवनांत दुःख भरलेले आहे. आपण दुःखाला सोडत नाही व दुःख आपल्याला सोडत नाही अशी परिस्थिती आहे.
देवाचा विसर हा आपण समजतो तो विसर नाही. आठवणीत असलेल्या गोष्टीही काही कारणामुळे प्रयत्न करूनही आठवत नाही याला आपण विसर म्हणतो. उदाहरण द्यायचे झाले तर एखादया माणसाचे नांव आपल्याला आठवत नाही. आठवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला त्याचे नांव आठवत नाही मग तुम्ही काय म्हणता आतापर्यंत मला ते नांव आठवत होते आता मी ते विसरलो. थोडया वेळाने चटकन आठवते व आपण म्हणतो हो हेच नांव मला हवे होते. हे नांवाच्या बाबतीत होते तसे देवाच्या बाबतीत होत नाही.
देवाचा विसर झालेला आहे, हे सद्गुरू सांगतात म्हणून ,
सद्गुरूवाचोनी सापडेना सोय,
धरावे ते पाय आधी आधी.
आठव करायचा म्हणजे काय करायचे? आठव करायचा म्हणजे कसा करायचा? आठव करायचा म्हणजे नेमके त्यासाठी काय प्रयत्न करायचे? त्याचा फायदा कसा होतो? काय होतो या गोष्टींचे ज्ञान झाल्याशिवाय ख-या अर्थाने देवाचा आठव होत नाही.
लोक नामस्मरण करतात, त्यात त्यांना नामाचे स्मरण असते, ते देवाचे स्मरण नसते. *देवाचे स्मरण वेगळे व नामाचे स्मरण वेगळे. आज जगांत नामाचे स्मरण करणारे लोक खूप आहेत. संत सांगतात,
रामनाम सब कोई कहे,  ठग ठाकूर और चोर
जिस नामसे प्रल्हाद ध्रुव तरे, वो नाम कुछ और
सद्गुरु श्री. वामनराव पै.

error: Content is protected !!