कातवी गावातील ‘पहिली महिला पोलिस’ बनली ‘क्षितिजा चव्हाण’,

कातवी (ता. मावळ) : गावातील सर्वसामान्य कुटुंबातील क्षितिजा शिवाजी चव्हाण ही गावामधून पोलिस खात्यात जाणारी पहिली महिला ठरली आहे. क्षितिजाची मुंबई पोलिस दलात निवड झाल्याने तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

वडील शिवाजी चव्हाण आणि आई शोभा चव्हाण यांनी लेकीला अगदी हलाखीच्या परिस्थितीतून शिकवले. आई वडिलांच्या कष्टांचे योग्य चीज करत लेक आज पोलिस दलात सिलेक्ट झाल्याने त्यांचीही मान अभिमानाने उंचावली आहे. कातवी गावचे शिवाजी चव्हाण हे नोकरी व्यवसाय करुन घर चालवतात, तर शोभा या गृहिणी आहे. आपल्या लेकीने इतरांपेक्षा अधिक वेगळं काही करुन स्वतःच्या पायावर उभे रहावे, असे त्यांना नेहमी वाटत. त्यामुळेच त्यांनी तिच्या शिक्षणात कधीही काहीही कमी पडू दिले नाही.

क्षितिजा ही देखील अभ्यासात पहिल्यापासून हुशार होती. तिने नवीन समर्थ विद्यालयातून माध्यमिक शिक्षक घेतले. तर उच्च माध्यमिक शिक्षण इंद्रायणी विद्यालयातून घेतले. बारावी नंतर क्षितिजाने आपण पोलिस बनायचं हे स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न सुरु केले. शौर्य करियर अकादमी इथे अभ्यास आणि सराव सुरु केला. तब्बल तीन वर्षे क्षितिजाने यासाठी कठोर मेहनत घेतली. अखेर तिचे आणि तिच्या कुटुबीयांचे स्वप्न साकार झाले आणि ती मुंबई पोलिस दलात सिलेक्ट झाली.

error: Content is protected !!