संकल्पसिध्दीचे गुपित विश्वप्रार्थना
विश्वप्रार्थनेतील “सर्वांचं रक्षण कर” याविषयी मार्गदर्शन
जगातील प्रत्येक माणसाला स्वतःचा जीव प्रिय असतो. जीवाचे रक्षण करण्यासाठी तो जीवाचे रान करतो. आपल्याला जसा आपला जीव प्रिय आहे त्याचप्रमाणे तो इतर माणसांनाही प्रिय असतो, याचे भान अनेक लोकांना नसते. लोकांना या सत्याची जाणीव नसल्यामुळे माणसे एकमेकांना जीव देण्याऐवजी एकमेकांच्या जीवावर उठतात.
हीच मानवजातीची शोकांतिका आहे. म्हणून ही जाणीव लोकांना प्रकर्षाने व्हावी यासाठीच विश्वप्रार्थनेत “सर्वांच रक्षण कर” असे प्रार्थिलेले आहे.
दुसरा मुद्दा असा की , ………..
विश्वप्रार्थना हे एक सुदर्शन चक्र आहे.भगवान श्रीकृष्णाच्य हातात सुदर्शन चक्र असे आणि ते सुष्टांच्या रक्षणार्थ दुष्टांचा संहार करून फिरून देवाच्या बोटात येऊन बसे.
परंतु …………
विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र हे वेगळे आणि आगळे असून विलक्षण व विस्मयकारक आहे. “सुरेख विचारांचे दर्शन” म्हणून हे आहे.
“सु-दर्शन चक्र”. नित्य विश्वप्रार्थना करण्याने हे चक्र साधकाचे भोवती फिरत रहाते. हे विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र साधकाचे दुष्ट लोकांपासून रक्षण करते, त्याचबरोबर ते दुष्टांचा संहार न करता त्यांचे रूपांतर सुष्टात करते.
       हे सुदर्शन चक्र शत्रूपासून साधकांचे रक्षण करते त्याचबरोबर ते शत्रूना न मारता त्याचे परिवर्तन मित्रात करते. हे सुदर्शन चक्र साधकाचे कुविचारापासून रक्षण करते, कारण सुंदर विचारांनी भरलेले हे सुदर्शन चक्र कुविचारांना मनातून हुसकावून लावते.
       कुसंगती ही सर्वात अनिष्ट गोष्ट असून सर्व दुःखाला आमंत्रण देणारी आहे.या कुसंगतीपासून विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र साधकाचे रक्षण करते,
कारण ……….
विश्वप्रार्थनेच्या सुदर्शनाचा प्रभाव जबरदस्त आहे की, ते दुष्ट व दुर्जन लोकांना जवळ येऊ देत नाही.हे विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र  साधकाचे सर्व व्यसनांपासून रक्षण करते, कारण विश्वप्रार्थनेच्या सुदर्शन चक्रामुळे सज्जन, निर्व्यसनी लोक साधकाच्या जवळ येतात.
दुर्जन व्यसनी मित्र आपोआप दूर होतात, साधकाचे विचार बदलतात, आवड बदलते आणि परिणामी त्याची व्यसने गळून पडतात. विश्वप्रार्थनेच्या सुदर्शन चक्रामुळे साधकाचे संकटापासून रक्षण होते.
कारण ……विश्वप्रार्थनेच्या विलक्षण प्रभावामुळे संकटे त्याच्या जवळ येत नाहीत व जवळ असलेली संकटे दूर होतात.
म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात, —
नामाच्या चिंतने। बारा वाटा पळती विघ्ने।।
समर्थ रामदास स्वामी सांगतात, —
नामे संकटे नासती। नामे विघ्ने निवारती।।
    नामस्मरणे पाविजेती। उत्तम पदे।।
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नित्य विश्वप्रार्थना करण्याने साधकाचा एका बाजूने “संसार सुखाचा होतो” व दुसऱ्या बाजूने त्याला “सच्चिदानंद स्वरूपाची प्रचीति येऊन” त्याच्या जीवनाचे सार्थक होते.
सद्गुरू श्री वामनराव  पै

error: Content is protected !!