शरीर साक्षात् परमेश्वर, सैतान सुध्दा
मानवी शरीर हा एक मौल्यवान परीस आहे.पुराणामध्ये परीस या मौल्यवान वस्तुचा उल्लेख केलेला आहे. या परिसाचे महत्त्व असे की, त्याचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंडाचे सोने होते.परंतु लोखंडाचे ‘सोने करणे’ या व्यतिरिक्त परिसाजवळ अन्य कांहीही सामर्थ्य नाही.
याच्या उलट मानवी शरीररूपी परिसाचे आहे. हा मानवी शरीररूपी परीस विशिष्ट परिस्थितीत ज्याला ज्याला स्पर्श करतो त्या सर्वांचे ‘सोने’ करतो. याच्या उलट विशिष्ट परिस्थितीत तोच शरीर रूपी परीस ज्याला ज्याला स्पर्श करील त्याची माती करून टाकतो.
सुंदर विचार,मधुर उच्चार व उत्कृष्ट आचार या सर्वांनी भरलेला व भारलेला शरीररूपी परीस विश्वात कुठेही गेला किंवा कुठल्याही क्षेत्रात त्याने प्रवेश केला तरी तो आपल्या अलौकिक सामर्थ्याने तेथील परिस्थिती व वातावरण सोनेरी करील, सुरळीत व सुगंधित करील.
हे घडवून आणण्यासाठी शरीररूपी परीस विशिष्ट प्रक्रियेने चार्ज (Charge) केला पाहिजे. उत्तम शिक्षण,उत्कृष्ट शिकवण व सुंदर संस्कार यांच्या द्वारा शरीररूपी परीस बालपणापासून प्रभावीपणे भारला गेला पाहिजे. तरच तो शरीररूपी परीस मानवी जीवनातील सर्व क्षेत्रात जेथे जाईल तेथील सर्व वस्तुंना, परिस्थितीला व माणसांना स्पर्श करील व त्या सर्वांचेच रूपांतर ‘सुवर्णात’ करील.
याच्या उलट निकृष्ट दर्जाचे शिक्षण,अनिष्ट शिकवण,गलिच्छ संस्कार,अज्ञान, अंधश्रद्धा,अहंकार व असहिष्णुता या सर्व अनिष्ट गोष्टींनी भारलेला शरीररूपी परीस जेथे जाईल तेथे स्पर्श करीत सर्वांची माती करील. थोडक्यात, शरीररूपी परीस असा विलक्षण आहे की,स्पर्श करून सोने करण्याचे किंवा स्पर्श करून माती करण्याचे प्रचंड सामर्थ्य या शरीररूपी परिसाच्या ठायी वास करते.
म्हणून स्पर्श करून सोने करणारा परीस तुम्हाला हवा की स्पर्श करून सर्वांची माती करणारा परीस हवा, हे तुम्हीच ठरवायचे आहे,अन्य कोणीही नाही.म्हणूनच जीवनविद्या सांगते.
सद्गुरू श्री वामनराव पै

error: Content is protected !!