गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल: राज्यपाल रमेश बैस
पिंपरी:
“इंग्रजांनी गुन्हेगार म्हणून घोषित केलेल्या भटक्या विमुक्त जनजातींमधील विद्यार्थ्यांना कलाकौशल्य शिकविल्याने गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे!” असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे काढले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल बोलत होते. पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, विश्वस्त मिलिंद देशपांडे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, विधानपरिषद आमदार उमा खापरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
राज्यपाल रमेश बैस पुढे म्हणाले की, “क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या या भूमीत वावरताना अभिमान वाटतो. त्यांच्या नावाने स्मारक समितीने अनुपम्य प्रेरणास्थान निर्माण केले आहे. आज देश एका बाजूला चांद्रयानसारखी गौरवास्पद कामगिरी करीत आहे; तर दुसरीकडे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेला भटक्या विमुक्त जनजातींमधील समाज आहे. संविधानाने त्यांना हक्क प्रदान केले असले तरी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्य प्रशंसनीय आहे. अशा कार्याला मदत करण्यासाठी शासन नेहमीच तत्पर राहील!” अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेखर सिंह यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकाच कुटुंबातील तीन बंधूंनी दिलेले बलिदान अतुलनीय आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन असंख्य क्रांतिकारक निर्माण झाले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीला नेहमीच महापालिकेने अर्थसाहाय्य देऊन सहकार्य केले आहे!” असे विचार मांडले. गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून, “केंद्र सरकारच्या नवीन अभ्यासक्रमानुसार गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते!” अशी माहिती दिली.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ आणि समारोप करण्यात आला. गुरुकुलम् मधील विद्यार्थिनींनी महाराष्ट्रगीताचे गायन केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारतमाता तसेच क्रांतिवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. गणेश कामठे या गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांने वीस राज्यांमधून स्पर्धात्मक यश संपादन केल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. भटक्या विमुक्त जनजातींमधील विद्यार्थ्यांना आधार कार्ड आणि जन्मदाखला मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल जिल्हा विधी प्राधिकरण पुणे सचिव न्यायाधीश सोनल पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, धर्मदाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के, बलवंत गायकवाड, आणि उपविभागीय अधिकारी संजीव आसवले यांचा राज्यपालांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सांगता समारंभानंतर गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना आधार कार्ड आणि जन्मदाखला यांचे वितरण करण्यात आले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कोषाध्यक्ष रवींद्र नामदे, सदस्य अशोक पारखी, नितीन बारणे, आसराम कसबे, शकुंतला बन्सल, नीता मोहिते, सुहास पोफळे, राहुल बनगोंडे, अविनाश मोकाशी, अण्णाराय बिरादार, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आणि समिती संचालित शाळांमधील शिक्षकवृंद, पदाधिकारी, कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सतिश गोरडे यांनी आभार मानले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम