![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/02/Picsart_23-02-16_09-15-24-355.jpg)
आसाम सरकारचा जाहीर निषेध
मुंबई:
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. आता महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी केला आहे.
त्यांच्या या दाव्याचा “ मुंबई डबेवाला असोशिएशन” जाहीर निषेध करत आहे. पौराणिक मान्यतेनुसार शंकराची बारा ज्योतिर्लिंगे आहेत. शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, त्रिंब्यकेश्वर, वेरूळ घृष्णेश्वर डाकिन्या भिमाशंकर ही पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. आता आसामने श्लोकात सहाव्या क्रमांकावर येणाऱ्या ज्योतिर्लिंग डाकिन्या भीमाशंकरवर दावा केला आहे. महाशिवरात्रीपूर्वी आसाम सरकारने एक जाहिरात काढली आहे.
त्यात भारतातील सहावे ज्योतिर्लिंग आसाममधील कामरूप जिल्ह्यातील डाकिनी टेकडीवर वसलेले आहे. असा आसाम सरकारचा दावा आहे.
मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले,”
भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात आहे. भीमा नदीचा उगम येथे झाला आहे. अशी ओळख अनादी काळापासून आहे. दुसरीकडे, आसामच्या पर्यटन विभागाने वृत्तपत्रावरील आपल्या पूर्ण पानाच्या जाहिरातीत लिहिले आहे की, ‘भारतातील सहावे ज्योतिर्लिंग स्थळ कामरूपच्या डाकिनी पहाडमध्ये आपले स्वागत आहे.’ या जाहिरातीत शिवपुराणाचा उल्लेख करताना भीमाशंकरची कथाही सांगण्यात आली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या छायाचित्रासह आवाहन करण्यात आले आहे की, “नैसर्गिक सौंदर्य असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या पवित्र ठिकाणी या.” महाशिवरात्रीच्या अध्यात्मात लीन होऊया.आसाम सरकारच्या जाहिरातीत भीमाशंकरच्या कथेचा उल्लेख आहे. यात शिवपुराणचा दाखला देऊन लिहिले आहे की, रावणाचा भाऊ कुंभकर्ण याला भीम नावाचा मुलगा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा जन्म झाला. भगवान रामाने आपल्या वडिलांचा वध केला हे त्याला माहीत नव्हते. ही गोष्ट त्याला आईकडून कळल्यावर त्यांनी ब्रह्माजींची तपश्चर्या केली आणि विजयी होण्यासाठी वरदान मागितले.
वरदान मिळाल्यावर तो अहंकारी झाला. त्याने युद्धात देवांचाही पराभव केला. यानंतर देवता शिवाकडे गेल्या. शिवाने देवतांना आश्वासन दिले की राक्षसांच्या अत्याचाराचा लवकरच अंत होईल. महादेवाने युद्धात भीमा राक्षसाला भस्म करुन राख केलं. यानंतर भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपात शिव येथे विराजमान आहे.
आसाम सरकारचा हा जावई शोध आहे ? आसाम सरकारचा हा दावा हास्यपद आहे. त्यांच्या या दाव्याचा आम्ही निषेध करतो. मुंबईच्या डबेवाल्यांची मुळ गावे ही भिमाशंकराच्या पंचक्रोशीत आहेत आसम सरकारच्या या अजब दाव्या मुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने आसाम सरकारचा हा दावा खोडून काढला पाहीजे.
- शिक्षणाचा दर्जा न संभाळणा-या शिक्षकाला सेवेतून कमी करणार: दिपक केसरकर
- विद्रोह विवेकी असावा: प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस
- नूतनचे प्रा.दीपक पाटील यांना डॉक्टरेट
- शिवदुर्ग टीमचे प्रशासनाकडून कौतुक
- अतिवृष्टी असलेल्या भागातील शाळांना सुट्टी
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/02/Picsart_22-11-05_10-52-40-099-3-717x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/02/PicsArt_12-30-07.46.22-10-712x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/02/Picsart_22-08-30_16-40-52-618-21-1024x932.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/02/Picsart_22-10-19_18-11-53-263-7-196x300.jpg)