नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
तळेगाव स्टेशन:
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ” ऋणानुबंध – २०२२”  माजी विद्यार्थी मेळावा आणि शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील प्रवेशित नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच संपन्न झाला.
या  मेळाव्यात २०१२ बॅच पासूनचे विद्यार्थी सहभागी झाले होते.  याप्रसंगी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, केंद्रीय राखीव  पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक दर्शनलाल गोला, अभिजीत इंजिनिअर्सचे  डायरेक्टर दादासाहेब उऱ्हे व  शशिकांत हळदे, तसेच महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असोशिएशन चे अध्यक्ष  डॉ. शीतलकुमार रवंदळे, प्राचार्य डॉ. विलास देवतारे आदी  मान्यवर उपस्थित होते.
‘फक्त शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी न घेता आपल्या शिक्षणाचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग हा देश सेवेसाठी सुद्धा करा,’ असे आवाहन दर्शनलाल गोला यांनी बोलताना केले.
“अभ्यासक्रम आणि उद्योग जगतातील तंत्रज्ञान यातील अंतर हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच कमी करून प्रत्यक्ष औदयोगिक समूहासोबत काम करून, औदयोगिक भेटी दाव्यात. भविष्यात स्वतःला विकसित करण्यासाठी याचा उपयोग होईल ,” असे मत हळदे  यांनी व्यक्त केले.
‘नूतन संस्थेत माजी विद्यार्थ्यांसाठी उद्योजगता समन्वयाचे विविध उपक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांची प्रगती ही संस्थेची अभिमानाची बाब आहे. संस्था कायमच तुमच्या यशासाठी सहकार्य करेल, तुमचे कौतुक करेल’, अशी भावना संतोष खांडगे यांनी व्यक्त केली.
डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी आपल्या मनोगतामध्ये  माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘सातत्याने स्वतःला स्पर्धात्मक आणि गुणात्मक बनवा. विविध प्रशिक्षणाद्वारे आधुनिक तंत्रज्ञान शिका. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी कार्यरत आहे. तिथून नूतन संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त सहकार्य करा’, असे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे यांनी  महाविदल्यामधील विविध उपक्रमांची माहिती देऊन आगामी काळातील वाटचालीसाठी कल्पक योजना देखील मांडल्या. तसेच माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनेक मनोरंजक किस्से सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी हंचाटे आणि प्रथम भोर, निधी हेडगे या विद्यार्थ्यांनी केले. विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इशिका बंसल आणि पार्थ जैसवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोलाचे योगदान दिले.

error: Content is protected !!