तळेगाव स्टेशन:
येथील नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स  महाविद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रशालेच्या प्राचार्या वासंती काळोखे, पर्यवेक्षक  रेवाप्पा शितोळे यांच्या शुभहस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली.

१८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यापिका कावेरी कोडभर यांनी केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनपट आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

तसेच यावेळी छत्रपती शाहू महाराजांवरील ऊर्जा गीत व पोवाडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी अ मधील विद्यार्थिनी कुमारी साक्षी गायकवाड व कुमारी समीक्षा मुंडे यांनी केले. अध्यापिका  अनुराधा हुलावळे यांनी विद्यार्थ्यांना गोष्टीच्या माध्यमातून राजश्री छत्रपती शाहू महाराज एक आदर्श राजा यांची ओळख करून दिली .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयातील कलाअध्यापक  योगेश पाटील यांनी केले.

error: Content is protected !!