“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २० वा”

ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात —
अनंत जन्मांचे तप एक नाम।
सर्व मार्ग सुगम हरिपाठ।।

🙏नामाचे महातप एवढे मोठे आहे की, अनंत जन्म तप करून जी पुण्याई मिळते ती याच जन्मात नामाच्या संकीर्तनाने मिळते.

✅ शिवाय तपमार्गाने जी पुण्याई मिळते ती पापपुण्यात्मक असल्यामुळे फार तर स्वर्गाची प्राप्ती करून देईल व त्या पुण्याचा क्षय झाल्यावर त्या साधकाला परत मृत्युलोकी आणील.

➡️ याच्या उलट नामाने जे पुण्य मिळते ते “शुद्ध पुण्य” होय. स्वत: निवृत्तिनाथ सांगतात-
नित्य नाम वाचे तोचि एक धन्य।
त्याचे शुद्ध पुण्य इये जनी।।

या शुद्ध पुण्याने नामधारकाला भगवंताचे प्रेमसुख अखंड भोगण्याचे भाग्य मिळते. नामाचे एवढे अलौकिक सामर्थ्य असून सुद्धां ते सर्व साधनांत सर्वच दृष्टीने अत्यंत सुलभ आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
योग याग क्रिया धर्माधर्म माया।
गेले ते विलया हरिपाठीं।।

नामाच्या या सुलभ पण श्रेष्ठ साधनेपुढे योग, याग, क्रिया, धर्माधर्म आदी सर्व साधने व्यर्थ होत. कारण अत्यंत कष्ट करून किंवा अपरिमित खर्च करून जे या साधनांनी प्राप्त होते, त्याच्यापेक्षा कितीतरी “अधिक लाभ नामस्मरणाच्या सुलभ साधनाने होतो”.

✅ सूर्याचा उदय झाला की त्याच्या प्रकाशात चंद्र, तारे, चांदण्या वगैरेंचा प्रकाश लयाला जातो, त्याप्रमाणे हरिनामाच्या तेजाचा प्रकाश एवढा मोठा आहे की, त्या प्रकाशात इतर सर्व साधनांचा प्रकाश पूर्णपणे लयाला जातो. हरिनामापुढे इतर सर्व साधने निष्प्रभ ठरतात.

म्हणून शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ज्ञानदेवी यज्ञयाग क्रियाधर्म।
हरिविण नेम नाही दुजा।।

🙏 गुरूकृपेने नामाचे हे अद्भूत सामर्थ्य मला कळल्यामुळेच, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नामावाचून इतर वर सांगितलेल्या कुठल्याही साधनांचा अवलंब करावयाचा नाही, असा मी निश्चय केला आहे. इतरांना ते तोच उपदेश करतात. *हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।* *पुण्याची गणना कोण करी।।* *--- सद्गुरू श्री वामनराव पै* . *✍️ स. प्र. (sp)1065*

error: Content is protected !!