विश्वास आणि आत्मविश्वास यशस्वी वकिलीचा मूलमंत्र : न्यायमूर्ती मिलिंद जाधव


पिंपरी :  ‘कायद्यावरील विश्वास आणि आपल्या अभ्यासातून प्राप्त झालेला आत्मविश्वास हा यशस्वी वकिली व्यवसायाचा मूलमंत्र आहे!’ असे विचार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथे व्यक्त केले.

दर्द से हमदर्द तक ट्रस्ट आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पाठ्यपुस्तकापलीकडील गुन्हेगारी कायद्याचे अनुभव आणि कायदेविषयक साहाय्य’ या विषयावरील मासिक प्रशिक्षण उपक्रमाच्या समारोप सोहळ्यात मिलिंद जाधव बोलत होते. पुणे जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ॲड. सोनल पाटील, दर्द से हमदर्द तक ट्रस्टचे सचिव ॲड. प्रकाश साळशिंगीकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

मिलिंद जाधव पुढे म्हणाले की, ‘कायदेविषयक कार्याची प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण घेणारी विधी विद्यार्थ्यांची ही पिढी अतिशय नशीबवान आहे, असे मला वाटते; कारण पदवी प्राप्त केल्यानंतर प्रत्यक्ष काम करताना अनंत अडचणी येतात. वकिली व्यवसायातून पैसे कमाविण्यात काहीच गैर नाही; पण त्याचबरोबर वकिलांनी सामाजिक अन् नैतिक भान ठेवणे खूप गरजेचे आहे. उत्तम वकील होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही.

स्वाभिमान, चिकाटी अन् सहनशक्ती, अद्ययावत व्यक्तिमत्त्व, वक्तशीरपणा, विनम्रता, विनोदबुद्धी या गुणांच्या साहाय्याने वकिली व्यवसायात उत्तुंग यश मिळवता येते. त्यादृष्टीने दर्द से हमदर्द तक ट्रस्टचे हे प्रशिक्षण अतिशय उपयुक्त आहे!’ महेंद्र महाजन यांनी, ‘विधी महाविद्यालयातील पाठ्यपुस्तकातून जे ज्ञान मिळते ते समाजातील विविध क्षेत्रांत कायदेविषयक काम करताना पुरेसे नसते. ती कमतरता अशा उपक्रमातून दूर करण्याचा ट्रस्टचा प्रयत्न स्तुत्य आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे सात लाख पंचेचाळीस हजार खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे न्यायालयात मोठा जनसमुदाय न्यायाच्या प्रतीक्षेत आढळून येतो. अशा प्रशिक्षण उपक्रमांमुळे सक्षम वकिलांची उपलब्धता वाढेल, असा विश्वास वाटतो!’ असे मत मांडले.

सोनल पाटील यांनी, ‘जिल्हा विधी प्राधिकरणाने विधी विद्यार्थ्यांसाठी अनुभवातून न्यायदानाची भूमिका स्पष्ट व्हावी म्हणून दर्द से हमदर्द तक ट्रस्टच्या साहाय्याने एक महिन्याच्या कालावधीचा हा उपक्रम विधी विद्यार्थ्यांसाठी राबविला. त्यामुळे सर्व शस्त्र – अस्त्रांसह कुरुक्षेत्रावर युद्धासाठी सिद्ध झालेल्या अर्जुनासारखेच हे प्रशिक्षित वकील आपली कायदेविषयक लढाई सक्षमपणे लढतील!’ असा विश्वास व्यक्त केला.

ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी प्रास्ताविकातून, ‘दर्द से हमदर्द तक ट्रस्टच्या कार्याची सुरुवात मुंबईपासून झाली असून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून दिग्गज विधिज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, गरीब अन् गरजू व्यक्तींना विनामूल्य समुपदेशन तसेच कायदेविषयक साहाय्य करण्यात येते. आतापर्यंत केवळ वकील मिळू न शकल्याने तुरुंगात खितपत पडलेल्या सुमारे ६००हून अधिक व्यक्तींना तुरुंगाबाहेर काढण्यात ट्रस्टला यश मिळाले आहे!’ अशी माहिती दिली.

दीपप्रज्वलन, भारतमाता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. दर्द से हमदर्द तक ट्रस्टने राबवलेल्या विधी विद्यार्थी प्रशिक्षण उपक्रमाची चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली; तसेच उपक्रमाच्या अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमात सहभागी झालेल्या विविध विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

दर्द से हमदर्द तक ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारी ॲड. सुनीता साळशिंगीकर, ॲड. खेताराम सोळंकी, ॲड. संकेत राव, ॲड. सोहम यादव, ॲड. महेश सोनवणे, ॲड. हिमांशू माने यांनी संयोजनात परिश्रम घेतले. ॲड. सतिश गोरडे यांनी आभार मानले. ॲड. गणेश नागरगोजे यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!